महात्मा गांधी भाषण मराठी | Mahatma Gandhi Speech In Marathi
महात्मा गांधी भाषण मराठी | Mahatma Gandhi Speech In Marathi
(२ ऑक्टोबर १८६९ ते ३० जानेवारी १९४८)
"Great people never dieThey join the galaxy of immortal."
असं महान माणसांबद्दल नेहमी म्हणतात. महात्मा गांधीजींबद्दल पण मला पुन्हा हेच म्हणावसं वाटतं.
'जगाच्या कल्याणा संतांच्या विभुती' ही उक्ती सार्थ वाटावी अशी संतप्रवृत्तीची कितीतरी नररत्ने या भारतभूमीत निर्माण झाली. त्यांनी स्वकर्तृत्वाने स्वतःची ओळख साऱ्या जगाला करून दिलीच, शिवाय देशाची मानही गौरवाने ताठ ठेवली. अशा थोर व्यक्तीपैंकी एक म्हणजे महात्मा गांधी! आपण सारे त्यांना 'राष्ट्रपिता' म्हणतो.
महात्मा गांधींचा जन्म काठेवाडमधील पोरबंदर या गावी २ ऑक्टोबर १८६९ साली झाला. त्यांचे आजोबा, पणजोबा हे सत्यवचनी, करारी आणि स्वामीनिष्ठ होते. गांधीजींनी आपल्या थोर घराण्यातील ह्या गुणांचा वारसा जोपासला. बालवयातील त्यांची जिद्द आणि चिकाटी वाखणण्याजोगी होती. एखादी गोष्ट करायचीच असे त्यांनी ठरविले की ती गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. ही त्यांची सवय त्यांनी शेवटपर्यंत तशीच ठेवली.
लहानपणी, वाईट मित्रांच्या संगतीमुळे त्यांना काही वाईट सवयी लागल्या होत्या. पण लवकरच त्यांच्या पापभीरू मनाला आपण जे करतो आहोत. ते अयोग्य आहे.' याची जाणीव झाली आणि त्यांनी वाईट वागायचे सोडून दिले. पुढे आयुष्यभरात त्यांनी कधीही मांस व मद्याला स्पर्श केला नाही.. विलायतेसारख्या थंड हवेच्या देशात मद्यपान सर्रास केले जाते. पण आईला दिलेल्या वचनाची आठवण ठेवून गांधीजी तिथही शुद्ध शाकाहारी राहिले.
विलायतेतून बॅरीस्टर होऊन आलेले मोहन गांधी हे थोडे बुजरे होते. पण सुसंस्कारांनी मात्र परिपूर्ण होते. त्यांनी काही दिवस राजकोट येथे वकिली केली. तेथे नीट जम न बसल्याने ते मुंबईला आले. स्वतःच्या सत्यवचनी स्वभावामुळे ते सत्याची बाजू मांडायला वाव असणारेच खटले चालवायला घेत असत. अधिक पैशाचे अमिष दाखवले गेले तरी त्यांनी खोटे खटले कधीच चालवले नाहीत.
आफ्रिकेतील एका पेढीच्या बोलावण्यावरून ते वकिली करण्यासाठी आफ्रिकेला गेले. तिथे काम करत असताना त्यांना पदोपदी वर्णद्वेषाचा प्रत्यय येऊ लागला. गोऱ्या युरोपियनांनी काळ्या लोकांवर, विशेषत: तिथे स्थायीक झालेल्या हिंदी लोकांवर कडक निर्बंध लादले होते. हा अन्याय गांधीजींना सहन झाला नाही. त्या विरुद्ध आवाज उठविण्याचे त्यांनी ठरविले. सरकारच्या काळ्या कायद्याविरुद्ध लोकमत जागृत करण्यासाठी त्यांनी सभा घेतल्या. लोकांचा स्वाभिमान जागृत केला. पण आफ्रिकन सरकार तसे बघत नव्हते. सत्याग्रहाची चळवळ फोफावली की तेवढ्यापुरते निर्बंध शिथील होत. काही दिवसांनी पुन्हा अगोदर हिंदुस्थानातील हिंदी जनता जर ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाली तरच आफ्रिकेतील हिंदी जनतासुद्धा गुलामगिरीतून मुक्त होईल असा विचार करून इ. स. १९१५ मध्ये गांधीजी भारतात परत आले.
आफ्रिकेत गांधीजींनी सत्याग्रहाचा जो मार्ग अवलंबला त्याला तसे काही प्रमाणात यश आले होते. आफ्रिकन सरकारने हिंदी लोकांना भरावा लागणारा दरडोई तीन पौंडांचा वार्षिक कर रद्द केला. गांधीजींना सत्याग्रहाच्या चळवळीने फार मोठी शक्ती दिली. सत्याग्रहाच्या अफाट ताकदीचा त्यांना प्रत्यय आला. म्हणून त्यांनी भारतात परत आल्यावर, ब्रिटीश राजवटीकडून भारतीयांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी सत्याग्रहाचाच वापर करण्याचे ठरवले.
नामदार गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु! त्यांच्या सांगण्यावरून गांधीजींनी संपूर्ण हिंदुस्थानभर प्रवास केला. हा सारा प्रवास त्यांनी रेल्वेच्या तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून केल्यामुळे त्यांना सामान्य, दीनदुबळ्या जनतेचे जवळून दर्शन घेणे शक्य झाले. त्यांच्या सुखदु:खाचे, अज्ञानाचे, अनारोग्याचेही दर्शन झाले. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी याच जनता जनार्दनाची महाशक्ती उपयोगात आणण्यापूर्वी त्यांना प्रथम शिक्षण दिले पाहिजे. स्वच्छतेचे धडे दिले पाहिजेत आणि मुख्य म्हणजे गुलामगिरीमुळे त्यांची भित्री बनलेली मने, निर्भय : केली पाहिजेत, असा निष्कर्ष त्यांना या भारत दौऱ्यामुळे काढता आला.
बिहार राज्यातील चंपारण्यातील शेतकऱ्यांवर होणारा ब्रिटीश मळेवाल्यांचा अन्याय दूर करण्यासाठी आणि अहमदाबाद येथील गिरणी मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा सत्याग्रहाचे तत्त्व अंमलात आणले.. दोन्ही प्रकरणात, शेवटी सत्याचाच विजय झाल्यामुळे त्यांचा सत्याग्रहावरील विश्वास अधिक दृढ झाला.
पहिल्या महायुद्धात ब्रिटीश सरकारला, भारताने फार मोठे मनुष्यबळ व अर्थिक बळ पुरवले. परंतु त्या बदल्यात ब्रिटीशानी स्वराज्य तर दिले नाहीच, उलट आणखीन अन्यायच सुरू ठेवले. गोऱ्या लोकांना अधिक सवलती असणारा रौलेट कायदा पास केला, जालियनवाला बाग हत्याकांड घडवले. खलिफांचे अधिकार काढून घेतले. या सर्व अन्यायामुळे गांधीजींना फार दुःख झाले. त्यांनी लोकांना 'कायदेभंगाच्या चळवळीचा अवलंब करा, तुम्हाला स्वराज्य मिळवून देतो' असे वचन दिले. 'सरकारविरुद्ध असहकारितेचे रणशिंग फुंकले. जुलमी, अन्याय करणाऱ्या ब्रिटीश सरकारला कोणत्याही बाबतीत सहकार्य करायचे
नाही' असे त्यांनी जनतेला आवाहन केले. सरकारी पदव्या, मानाच्या जागा सोडणे, सरकारी समारंभावर बहिष्कार, परदेशी मालावर बहिष्कार, शाळा कॉलेजवर बहिष्कार अशा गोष्टी सुरू झाल्या. हिंदु-मुस्लिमांनी अभूतपूर्व एकजुटीने ही चळवळ पुढे रेटली. पण चौरीचुरा येथे हिंसाचार होऊन या चळवळीला हिंसाचार आणि जाळपोळीचा कलंक लागताच गांधीजींनी ही चळवळ मागे घेतली. लगेच सरकारने गांधीजींना अटक करून १९२२ साली त्यांना ६ वर्षासाठी येरवड्याच्या तुरुंगात ठेवले.
१९३० साली त्यांनी पुन्हा कायदेभंगाची चळवळ सुरू केली. सरकारशी असहकार करूनही काही उपयोग होत नाही तेव्हा आता सरकारचे कायदे तोडायचेच, मार खायचा, स्वतःचे रक्त सांडायचे पण आता अन्याय सहन करायचे नाहीत असे त्यांनी जनतेला सांगितले. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे दांडी येथील मिठाचा सत्याग्रह !
शेवटी ब्रिटीश सरकारने गांधीजींशी बोलणी केली. व्हॉईसरॉय आयर्विन आणि गांधीजी यांच्यात एक करार झाला. त्यात जनतेच्या हिताच्या अनेक गोष्टी होत्या. १९३१ मध्ये इंग्लंड येथे झालेल्या गोलमेज परिषदेला गांधीजी 'भारताचे प्रतिनिधी' म्हणून उपस्थित राहिले. तेथे त्यांनी ' संपूर्ण स्वातंत्र्याची' मागणी केली.
अस्पृश्यांवरील अन्याय निवारण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम केले. त्यांच्यावरील अन्यायांना वाचा फोडण्यासाठी गांधीजीनी 'हरिजन' नावाचे साप्ताहिक सुरू केले.
सुधारणा विषयक कायदे पास करून ब्रिटीश सरकार भारतीयांचा असंतोष कमी करण्याचा प्रयत्न करी, पण स्वातंत्र्य देण्यास मात्र टाळाटाळ करी. शेवटी ८ ऑगस्ट १९४२ रोजी गांधीजींनी ब्रिटीशांना 'चले जाव'चा आदेश दिला. दीर्घ काळ चाललेल्या या 'चले जाव' आंदोलनापुढे ब्रिटीश सरकारने हात टेकले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. ब्रिटीश व्यथित झाले. त्यातच त्यांच्यावर सहकाऱ्यांच्या आणि पत्नीच्या मृत्यूचा आघात झाला. त्यामुळे ते खचत चालले. आयुष्यभर सत्यावर आणि अहिंसेवर अढळ श्रद्धा ठेवणारे गांधीजी खरोखरच महान होते. त्यांनी जगाला, समता आणि सत्याग्रह ह्या फार मोठ्या देणग्या दिल्या. सत्याग्रहाच्या बळावर, अशक्य वाटणारी कामे पार पाडणारा हा थोर महात्मा ३० जानेवारी १९४८ रोजी अनंतात विलीन झाला. पण त्यांच्या चैतन्यदायी विचारांची ज्योत अजून मनातून विझली नाही. म्हणूनच म्हणावसं वाटतं.
"ती पहा, ती पहा,बापूजींची प्राणज्योती.तारकांच्या सुमनमाला,देव त्यांना वाहताती."
Related searches
- महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती
- महात्मा गांधी भाषण इंग्रजी
- Mahatma gandhi jayanti nimitta bhashan
- महात्मा गांधी जयंती भाषण मराठी
- महात्मा गांधी भाषण मराठी pdf
- महात्मा गांधीजींचे भाषण
- महात्मा गांधी भाषण हिंदी
Tags:
Marathi